काही लोक मनगटातली
ताकत वापरत म्हणाले;
"आजपासून आंम्हाला साहेब म्हणायचं !"
मग लोकही फारसा विचार न करता
त्यांना ‘साहेब’ म्हणू लागले...
सर्व साहेबलोक मातृभूमीला ‘रियल इस्टेट’ मानत।
एके दिवशी सर्व साहेबांनी
मिळून मिसळून एजंट पेरून
स्वर्गाचं डील केलं आणि
मग हा स्वर्ग
साहेबलोकांनी आपल्या मर्जीतल्या
(किंवा सोयीच्या)
लोकांसाठी आरक्षित केला.
उरला नर्क
तर नर्काच्या बॅकग्राऊंडला साहेबलोकांनी
विकासाचं-प्रगतीचं सुंदर चित्र रेखाटून ठेवलं.
आणि नर्कवासी होऊ घातलेल्या जनतेला सांगीतलं;
" आंम्ही तुमच्यासाठी खास हा
विकासाचा आराखडा आखून ठेवलाय.
यात रंग भरत रहा.
आपण विकासाच्या खुप जवळ येऊन पोहचलो आहोत। "
मग जनता भारावली आणि
बदलत्या काळाशी जुळवून घेत
चित्रामध्ये रंग भरू लागली...
साहेबांचा जयघोष करू लागली.
साहेबही कृतार्थ नजरेने जनतेकडे पहात राहीले.
तरीसुद्धा त्या सुंदर चित्रामागे
काही लोक विव्हळताना ऐकू येत होते.
ते म्हणे या साहेबलोकांना
निष्कारण विरोध करत होते...